
पृथ्वीराज मोहोळ शिवराज राक्षे यांच्यात चांगलीच होणार लढत- पैलवान चंद्रावर पाटील
‘महाराष्ट्र केसरी’ मधील वाद मिटवण्यासाठीच सांगलीत करणार या कुस्तीचे आयोजन.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क विटा :
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांच्या कथित निकालामुळे सुरू झालेला वाद आता सांगलीच्या मातीत संपविण्याचा निर्धार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केला आहे. यंदाचा महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळ आणि डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे यांच्यात सांगलीत लढत निश्चित करण्यात आली आहे. या लढतीला दोन्ही मल्लांनी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे हा वाद आता सांगलीत संपेल, अशी आशा चंद्रहार यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत चंद्रहार पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘सांगलीतील तरुण भारत स्टेडियमवर हे मल्लयुद्ध होईल. त्यादृष्टीने आम्ही तयारीला सुरुवात केली आहे. पै. शिवराज राक्षे लढायला तयार होताच, गुरुवारी पै. पृथ्वीराज मोहोळ यानेही होकार दिला आहे. कुस्तीशौकिनांच्या मनात महाराष्ट्र केसरी आखाड्यात चुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या वादातून जी सल आहे, ती दूर होईल. शौकिनांना एक चांगली कुस्ती पाहायला मिळेल आणि वाद बाजूला ठेवून मल्ल नेहमी पुढे जात असतात, हा संदेश महाराष्ट्रभर जाईल. एका पंचाच्या पाच सेकंदाच्या चुकीच्या निकालाने शिवराज राक्षे यांच्या करिअरला मोठा धक्का बसला आहे. मात्र, या घटनेने महाराष्ट्रातील कुस्ती बदनाम होऊ नये, याची काळजी घेणे आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी हे मल्लयुद्ध आवश्यक होते. त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. त्यांना प्रत्येकी २५-२५ लाख रुपयांचे मानधन आम्ही देणार आहोत.
‘दोन-दोन स्पर्धा कशाला?
‘महाराष्ट्र केसरी’ ही अत्यंत मानाची स्पर्धा असून कुस्ती क्षेत्रातील राजकीय वाद बाजूला ठेवून नेत्यांनी एकविचाराने किमान या मानाच्या स्पर्धेचे सर्वोच्च स्थान अबाधित ठेवावे, अशी अपेक्षा चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली आहे.