

मानवी हक्काचे उल्लंघन करून कर्ज वसुली बंद करा: विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:
कोल्हापूर( प्रतिनिधी )
फायनान्स कंपन्यांच्या कडून मानवी हक्काचे उल्लंघन करून, चुकीच्या कर्जवसुली पद्धतीमुळे महिलांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. तरी लाडक्या बहिणींचे संसार वाचवा. अशा आशयाचे निवेदन महिला कर्जमुक्ती अभियानाच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर येथील उपनिरीक्षक पद्मा कदम यांना देण्यात आले. यावेळी कराड, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. कराड येथील नित्यधन फायनान्स कंपनीकडून अपहरण करून मारहाण झालेले कर्जदार दत्तात्रय गुरव, सांगली येथील फायनान्स कंपनीकडून फसवणूक झालेले व मानसिक त्रासाला कंटाळलेल्या महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या.
कायद्याचे उल्लंघन करून कर्ज वसुली होत असल्यास, त्याबाबतीत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन उपनिरीक्षक पद्मा कदम यांनी दिले. शिष्टमंडळाचे नेतृत्व अभियानाच्या प्रदेश अध्यक्षा विजयालक्ष्मी विनोद कदम, ॲड. त्रिशला पाटील,मुस्कान मुल्ला, सुनील फडतरे, सुशीला स्वामी, दत्तात्रय गुरव, आयुब सुतार, अनिल अदाटे यांनी केले.