
गगनबावड्यात जाळ रेषा काढण्यात दिरंगाई. जाळ रेषेसाठी वनविभागाला येण्याऱ्या निधीची चौकशी होणे गरजेचे.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- गगनबावडा / प्रदिप गुरव
प्रती महाबळेश्वर संबोधलेला निसर्ग संपन्न गगनबावडा तालुका वनविभागाच्या हलगर्जीपनामुळे जाळ रेषा न काढल्याने डोंगरच्या डोंगर आगीच्या ज्वालांनी भक्ष होत काळेकुट्ट पडत आहेत. जाळ रेषेसाठी असणार्या निधीची चौकशी होण्याची गरज आहे.निसर्ग संपन्न तालुका म्हणून गगनबावडा तालुक्याची ओळख आहे . येथील वनसंपदेचे, प्राण्यांचे रक्षण होण्यासाठी जाळ रेषा काढण्याची गरज आहे.विस्तीर्ण अशा जंगलात भलीमोठी झाडे असल्याने कडक उन्हातही दाट सावली या भागात आढळून येते. औषधी वनस्पतीसुद्धा या ठिकाणी आढळून येतात.अनेक प्रकारची फुलपाखरे येथे बागडताना दिसतात. पक्षाच्या अनेक प्रजाती या ठिकाणी आढळतात.


ससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, बिबट्या आदी वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत. पर्यटकांचे व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू (मोठी खार) सुद्धा येथे आहे.निसर्गाच्या अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे गिधाडे येथे आढळतात. महाराष्ट्रात एकूण ५२ अभयारण्ये असून सर्वात दुर्मीळ असा शेकरू हा प्राणी येथे आढळून येतो. उंचच्या-उंच झाडावरती अनेक पक्षाची घरटी आढळून येतात.निसर्गरम्य अशा तालुक्यात वन-विभागाने जळीत रेषा न काढल्याने डोंगरच्या डोंगर जळून काळेकुट्ट होवू लागले आहेत. वन्यजीवांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाळ रेषा काढण्याचे काम सुरु करणे गरजेचे आहे. जेणेकरून जंगल सुरक्षित राहावे व त्यामधील प्राणी, पशुपक्षी व वनसंपदा धोक्यात येऊ नये यासाठी जाळ रेषा खूप उपयुक्त आहे.
जाळ रेषा काढणे म्हणजेच जंगल क्षेत्रातील रस्त्याच्या कडेला असणारा भूभाग, येथे सुकलेले गवत व पालापाचोळा असतो. रस्त्यावरून जाणार्या व येणाऱ्या एखाद्या सिगरेट पिणार्या व्यक्तीने चुकून जर का सिगरेट अथवा माचिस काडी टाकल्यास सुके गवत तातडीने पेट घेऊन ही आग जंगल भागाच्या चहूबाजूला पकडली जाऊ शकते. यासाठी रस्त्याकडेला असणार्या भागात प्रथम जळीत रेषा काढून या भागातील सुक्या गवताला जाळले जाते ज्यामुळे जंगल सुरक्षित राहण्यास मदत होते. वनमजूर वनरक्षक व वनपाल हे जळीत रेषा काढण्यासाठी विशेष मेहनत घेण्याची गरज असताना गगनबावडा तालुक्यात जाळरेषा न काढल्याने अनेक डोंगर आगीचे भक्ष बनून काळे कुट्ट पडले आहेत याला जबाबदार कोण असा प्रश्न निसर्ग प्रेमींच्या कडून विचारला जात आहे.
गगनबावडा तालुक्यात जळीत रेषेसाठी येणारा निधी किती वापरला जातो किती मुरतो जिथे वापरला जातो तिथे वनवे लागतातच कशी याची सखोल चौकशी होणे गरजेच आहे वन्यजीव सुरक्षित रहावे व जंगल संपत्तीचे जतन व्हावे यासाठी जळीत रेषा काढणे खूप आवश्यक आहे.
