
अजित अनंतराव पवार : सत्ताकारणात धाडसी निर्णयांचा ठसा उमटवणारे नेतृत्व
दैनिक वृत्तवेग विशेष
अजित अनंतराव पवार(२२ जुलै १९५९ – २८ जानेवारी २०२६)हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ आणि प्रभावशाली राजकारणी होते. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी आपल्या स्पष्टवक्तेपणा, निर्णायक भूमिका आणि सत्ताकारणातील धाडसी पावलं यांमुळे वेगळी ओळख निर्माण केली.अजित पवार यांनी १९९१ पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. बारामती हा त्यांचा राजकीय बालेकिल्ला राहिला. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे होते. दीर्घकाळ सत्ताकारणात सक्रिय असलेल्या अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून पाच वेळा काम केले, त्यामुळे ते या पदावर सर्वाधिक वेळा राहिलेल्या नेत्यांपैकी एक ठरले.

२०१९ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला होता; मात्र अवघ्या तीन दिवसांत हे सरकार कोसळले आणि दोघांनी राजीनामा दिला.त्यानंतर २०२२–२३ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी सांभाळली.राजकीय आयुष्यातील सर्वात मोठा वळणबिंदू जुलै २०२३ मध्ये आला.
त्यांनी आपले काका शरद पवार यांच्यापासून वेगळा मार्ग स्वीकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अभूतपूर्व फूट पडली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर हक्क सांगितला, तसेच पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची भूमिका जाहीर केली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.बारामतीत होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते.
या सभांसाठी २८ जानेवारी २०२६ रोजी ते मुंबईहून बारामतीकडे VTSSK क्रमांकाच्या, LJ45 प्रकारच्या चार्टर विमानाने प्रवास करत होते.बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी सकाळी सुमारे ८.४५ वाजता विमानाचा भीषण अपघात झाला. रनवेच्या जवळ उतरत असतानाच विमान कोसळले आणि खाली पडताच त्याला आग लागली.

या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांचा जागीच मृत्यू झाला.अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. समर्थकांपासून विरोधकांपर्यंत सर्व स्तरांतून त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. सत्ताकारणातील त्यांच्या निर्णयांनी, वादांनी आणि नेतृत्वशैलीने ते कायमच चर्चेत राहिले; मात्र त्यांचा राजकीय ठसा महाराष्ट्राच्या इतिहासात कायम राहील.
दैनिक वृत्तवेग मुख्य संपादक : गणेश वायदंडे
