

दशरथ उर्फ राजू विलास कवडे याच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीस टाळाटाळ करत असणाऱ्या पोलिस तपास अधिकारी व संशयीत विजय सुर्वे यांचेवर कारवाई करणेबाबत.
विटा
भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका यांचे वतीने दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस ठाणे विटा येथे उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या निवेदनाची मागणी म्हणजे दशरथ उर्फ राजू विलास कवडे, रा. विटा याचे संशयास्पद मृत्यूच्या चौकशीसाठी मयताची पत्नी अश्विनी दशरथ उर्फ राजू कवडे यांनी तक्रार दिली होती. सदर तक्रारीची चौकशी करणारे चौकशी अधिकारी यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. त्यामुळे सदरचे गंभीर प्रकरण पोलिस गुंडाळण्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न पडला आहे. आज पोलिस स्थापना दिनाच्या निमित्ताने आपले कार्यालयासमोर होत असलेल्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेवून पिडीतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
सदर प्रकरणामधील संशयीत विजय सुर्वे याचेवर मयताची जमीन जागा हडपण्याच्या उद्देशाने मारहाण केल्यानेच राजू कवडे याचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट अद्याप आला नसल्याचे पोलिसांकडून समजते. संशयीत विजय सुर्वे याचे राजकीय संबंध वर पर्यंत असल्याने पोस्ट मार्टम रिपोर्ट बदलला जाईल काय अशी शंका आहे. वैद्यकिय अहवाल देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे का असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
एकूणच या प्रकरणामधील तपास करणारे तपास अधिकारी यांनी पिडीतेच्या अर्जासंबंधी आजपर्यंत कोणत्याही पध्दतीचा तपास केलेला नाही. या पाठीमागील कारण काय आहे हेही समजत नाही. तरी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून तपास करण्यास टाळाटाळ करणारे तपास अधिकारी यांचेवर कारवाई करावी. त्याच बरोबर राजू कवडे याच्या मृत्यूस जबाबदार व मयताची पत्नी व तिच्या कुटूंबियांना जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांचेवर कारवाई करावी, अन्यथा पून्हा एकदा भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका यांचेवतीने आपले कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे निवेदनात म्हटले आहे. व हे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग विटा यांना देण्यात आले.त्यानंतर सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल. याची ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यावर धरणे आंदोलन सोडण्यात आले.
हे धरणे आंदोलन भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा संदीप(तात्या)ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी उपस्थितांमध्ये ऍड प्रमोद भारते, अश्विनी कवडे,गणेश वाघमोडे, सुहास कुलकर्णी,पंकज(भैया)डबडे, अशोक सुळे, शिवाजीराव माने, गणेश वायदंडे,रविंद्र सनके, बाबुराव सकटे, शैलेश भिंगारदिवे, राहुल सकटे, सुनील खंदारे उपस्थित होते.